नेशन न्यूज मराठी टिम.
ठाणे/प्रतिनिधी – शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक घरुन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम नोंदणीसाठी देऊ नये, असे कृषि विभागातर्फे कळविण्यात आले आहे.याअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन https://pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते.
पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु.40 देण्यात येते. परंतु राज्यातील कही सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) धारक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने राज्याच्या कृषि आयुक्तालयाने आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून सामूहिक सेवा केंद्र धारकाकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. सेवा केंद्र धारकाने अतिरिक्त पैशाची मागणी केल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यात केले आहे.