नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – राज्यभरात उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा काढणीला सुरुवात झाली आहे. उन्हाळी भुईमुगाची काढणी जोमात सुरु आहेत. पोषक वातावरणामुळे उन्हाळी भुईमूग शेंगांचे पीक चांगले बहरले. दरवेळी पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने यावेळी जिल्ह्यातील कमी शेतकऱ्यांनीच भुईमूग शेंगांचे पीक घेतले. जळगाव जिल्ह्यातील भुईमुगाच्या विक्रीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भुईमूग शेंगा दाखल झाल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावामध्ये भुईमूग शेंगांना चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आपल्या शेंगा सरळ ग्राहकांना विकत आहेत. ओल्या शेंगांना क्विंटलमागे सहा हजार रुपये भाव तर कोरड्या शेंगांना साडेसात ते आठ हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग खुश आहे. मार्केटमध्ये क्विंटलमागे शेंगांना सहा हजार रुपये पर्यंत भाव असल्याने नागरिक शेतकऱ्यांकडूनच शेंगा विकत घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळतो आणि त्यांचा माल वेळेत विकला जात आहे.