DESK MARATHI NEWS ONLINE.
जळगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. शेतात पाण्याची व्यवस्था असल्याने बरेच शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड करतात. त्यामुळे शेतामध्ये कापसाचे पीक डोलताना दिसते. परंतु यंदा वीज पुरवठा (Power supply) नियमित होत नसल्याने लागवड केलेल्या कापसाला वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे कापूस पिकाच्या वाढीवर याचा परिणाम होत असल्याची माहिती कापूस उत्पादक शेतकरी गिरीश माळी यांनी दिली आहे.
कमी क्षेत्रावर कापूस (Cotton) लागवड केल्यामुळे त्याला पाणी भरण्यासाठी ठिबकच्या नळ्या टाकाव्या लागतात. कारण विजेचा पुरवठा नियमित होत नसल्याने कमी क्षेत्रावर लागवड केलेल्या कापसाला पाणी भरता येत नाही. पाणी कापसाच्या पिकापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी अनावश्यक खर्च करावा लागत आहे. जर पूर्ण वेळ वीज मिळाली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कापसाला पुरेसे पाणी देता येईल. ह्या कारणामुळे शेतकरी पूर्ण वेळ वीज मिळावी अशी मागणी शासनाकडे करत आहेत.