नाशिक/प्रतिनिधी – राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विहिरी, तलाव आणि नदी, इ जलस्त्रोतांवर अवलंबून असलेल्या अनेक गाव, खेडयांना याचा फटका बसत आहे. या जीवघेण्या उन्हामुळे तर पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विकसित असलेल्या येवला तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाची सरासरी घटल्याचे चित्र आहे. येवला तालुक्यातील काही विहिरी इतक्या कोरड्या पडल्या आहेत कि त्या आता तहान भागवण्यात सक्षम राहिलेल्या नाहीत. एका चातक पक्षाप्रमाणेच गावकरी पावसाची आतुरतेने वाट बघता आहेत.
भीषण पाणीटंचाई (Water shortage) निर्माण झाल्यामुळे पाण्याचा साठा अपुरा पडत आहे. अक्षरशा विहिरींनी तळ गाठल्यामुळे येवला तालुक्यातील वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शासनाच्या टँकरवर तहान भागवण्याची वेळ आल्याने 2 ते 3 लाख रुपये खर्च करून राजापूर येथील शेतकरी गणेश घुगे विहिरीचे खोलीकरण करत होते. मात्र, विहीर 50 ते 60 फूट खोल करूनही पाणी लागत नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. आता मोठा पाऊस होऊन विहिरींना पाणी येत नाही तो पर्यंत गावात टँकर सुरू ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली जाते.