नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – ‘मेहनत करणे वालो की कभी हार नही होती’ हे वाक्य खरं सिद्ध करून दाखवलं आहे ते अमरावती मधील माला पापडकर हिने. दिव्यांग असूनही देशातली अवघड परीक्षा तिने उत्तीर्ण केली आहे. थोडं अपयश आलं की काही लोक खचतात आणि त्याचं भांडवल करत बसतात. मालाला सुद्धा खूप अडचणी आल्या मात्र तिने प्रत्येक अडचणीवर हसत-हसत मात केली. मेहनत, चिकाटी त्यासोबत रोज दहा तास अभ्यास करून तिने इतिहास रचला.
20 वर्षापूर्वी दोन्ही डोळयांनी अंध असलेली माला जळगाव येथे पोलीसांना रेल्वेस्टेशन वर बेवारस स्थितीत सापडली होती. पोलीसांनी तीच्या आई वडिलांचा नातेवाईकांचा शोध घेतला तेव्हा ते न सापडल्याने लहान मालाला जळगाव येथील रिमांडहोम मध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुणर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्या कारणाने बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशान्वये पोलीसांनी वझ्झर येथील स्व.अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात मालाला दिले. माला हीला शंकरबाबाचे नाव देवून त्या आधारवर तीचे आधार कार्ड, निवडनुक ओळखपत्र तसेच रहीवासी दाखला इ, कागदपत्राची पुर्तता केली.
मालाने 4 थी पर्यंतचे शिक्षण शिक्षण परतवाडा येथील यशवंत अंध विद्यालयामध्ये घेतले. त्यानंतर तिने पुढील शिक्षण आय एस गर्ल्स हायस्कूल परतवाडा घेतले. बारावीची परीक्षेत माला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. पुढील उच्च शिक्षणाकरीता तिने अमरावती येथील नामांकित विदर्भ महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवीधर आणि पदवित्तर या दोन्ही उच्च शिक्षणाकरीता दर्यापुरचे प्रा. प्रकाश टोपले पाटील यांनी मालाचे पालकत्व स्वीकारून तीही संपूर्ण व्यवस्था केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उर्त्तीण होवून मालाने इतिहास घडविला. त्यानंतर मालाच्या पुढील पुनर्वसनाचे काय ? हा गंभीर प्रश्न सतत बाबांना भेडसावत होता अशातच दैव योगाने अमरावती येथील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी बाबांकडे जावून मालाच्या एमपीएससी च्या परीक्षेच्या तयारीची जबाबदारी स्वीकारली.
तहसीलदार आणि इतरही पदाच्या परीक्षा पहिली परिक्षा मालाने दि.21/8/2022 व दुसरी परिक्षा दि.17/12/2023 रोजी दिल्या. परंतु यात तीला यश मिळाले नाही. नंतर तीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपीक (टंकलेख्न) ही परीक्षा दिली असता तिला या परीक्षेत मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या दिव्यांगाच्या पुनर्वसनाच्या इतिहासातील ही घटना सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. कारण माला ही बेवारस अनाथ दिव्यांग असून देखील बुध्दीमत्तेच्या जोरावर तिने हे यश मिळवून अशक्य वाटनारी गोष्ट शक्य करून दाखवली.



