नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेदरम्यान काही बाह्य हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.
वनविभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी जाहीरात देऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा, अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशाप्रकारच्या अपप्रवृत्ती, अपप्रचार निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिस यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी. तसेच जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अनैतिक मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असेही महसूल व वन विभागाने म्हटले आहे.



