DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – राज्य सरकारडून एक विधानसभा एक रेशनिंग कार्यालय या धोरणाची अमंलबजावणी करण्याचे नियोजन सुरू असून शासनाच्या या धोरणाचा फटका भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदलापूर येथील रहिवाशांना बसणार आहे.शासनाच्या नव्या धोरणानुसार बदलापूर मधील सद्यस्थितीत असलेले रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट होणार आहे.मात्र बदलापूर ते मुरबाड हे अंतर ३० ते ३५ किमी असुन प्रवासाला सुमारे दीड तासापेक्षाही जास्त कालावधी लागतो.त्यातच मुरबाड येथे जाण्यासाठी दळणवळणाच्या हव्या तितक्या सुविधा नसल्याने नागरिकांना केवळ राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेवर अवलंबुन राहावे लागते व हि बस सेवा एक ते दीड तासाच्या अंतराने असल्याने बदलापूर येथील नागरिकांना नविन शिधापत्रक घेणे किंवा शिधापत्रिकेच्या आवश्यक कामकाजाबददल बदलापूर येथुन मुरबाडला जाणे त्रासदायक होणार आहे.भविष्यात या त्रासामुळे मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता असल्याने बदलापूर येथील रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट करू नका अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळ्या मामा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्याचे अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बदलापूर येथे २० ते २५ वर्षापासून अन्न व नागरी पुरवठा विभागाचे रेशनिंग कार्यालय आहे. सध्या या रेशनिंग कार्यालयात धान्यांचा लाभ घेणारे १२०६८ कार्डधारक लाभार्थी असून या कार्डावर ४८८१७ लोकसंख्येची नोंद आहे. धान्य न मिळणारे केशरी शिधापत्रिका धारक १३७४८ आहेत. त्यांची लोकसंख्या ही ४७४९९ इतकी आहे. तसेच शुभ्र शिधापत्रिका धारक २०५२५ असुन त्यांची लोकसंख्या ७६७०९ इतकी आहे. असे मिळून एकूण शिधापत्रक धारक हे ४७०७१ असुन त्यावरील लोकसंख्या ही १७६४४९ एवढी आहे. त्यातच आता बदलापूर शहर मोठ्या प्रमाणात विस्तारत असून येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बदलापूर येथील रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयात समाविष्ट झाल्यास बदलापूर मधील नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बदलापूर येथील रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयात समाविष्ठ करू नये अशी मागणी खासदार बाळ्या मामा यांनी केली आहे.