नेशन न्यूज मराठी टीम.
भिवंडी/प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भिवंडीतील अंबाडी प्रवासी बस थांब्याच्या समस्येवर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून उपायोजना करण्यात आली आहे. प्रवासी नागरिकांसाठी भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका येथे श्रमदानातून बस स्टँड उभारण्यात आले आहे. जिजाऊने केलेल्या या कामाचे परिसरांतून कौतुक केले जात आहे.
भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका या ठिकाणी नेहमीच लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . लोकांनी गजबजलेला असा हा नाका असून भिवंडीकडे ,वाड्याकडे ,शहापूर तसेच वसईकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना हा सोयीस्कर नाका आहे. भिवंडी शहराच्या वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने आणि नूतनीकरणामुळे अंबाडी येथे प्रवाशी वाहतूक वाढली आहे . या ठिकाणी प्रवाश्यांना उभे राहण्याकरता प्रवासी बस थांबा असणे हे अत्यंत गरजेचे होते . येथील नागरिकांची देखील ही सततची मागणी होती.
लोकांच्या जनभावनेचा आदर करून जिजाऊ संस्थेने या कामी पुढाकार घेत संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी बस थांब्याकरीता लागणारे सर्व साहित्य पुरवले. यानंतर परिसरातील सर्व जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते तसेच येथील नागरिकांनी मिळून श्रमदानातून अवघ्या एकाच दिवसात हा प्रवासी बस थांबा या ठिकाणी उभा केला आहे. अशाच पद्धतीने पुढील काही दिवसांमध्ये अजून अंबाडी नाका व वारेट-पहारे असे दोन प्रवासी थांबे अंबाडी येथे उभे करण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या प्रवासी बस थांब्याच्या उद्घाटन प्रसंगी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे , लोकसभा संपर्कप्रमुख मोनिकाताई पानवे, पालघर जिल्हा परिषदेचे सभापती संदेश ढोणे, महेंद्र ठाकरे, योगेश भोईर, नरेश धोडी ,डॉक्टर गिरीश चौधरी तसेच जिजाऊ संघटनेचे सर्व पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी परिसरातील नागरिकांनी जिजाऊ संस्थेचे आणि निलेश सांबरे यांचे आभार व्यक्त करत समाजहितासाठी अहोरात्र झटणाऱ्या जिजाऊ संस्थेसोबत आपण यापुढे कायम सोबत असू अश्या भावना व्यक्त केल्या .



