नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस, इ. टोमॅटोचा वापर केला जातो. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. पण तापमानातील चढउताराचा वाईट परिणाम टोमॅटोच्या रोपावर होतो.
सध्या उष्णतेचा पारा आपल्याला चांगलाच वाढलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच संगमनेर तालुक्यातील कोकण गावच्या एका युवा शेतकऱ्याने आपल्या पिकांचे उन्हापासुन संरक्षण करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. शुभम जोंधळे असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. शुभम जोंधळे यांनी टोमॅटोचे पीक घेतले आहे. मात्र त्याला उष्णतेचा फटका बसत होता आणि पॉलिहाऊस सारखी मोठी यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढे पैसे देखील नव्हते.
मग शुभम यांनी एक अनोखी शक्कल लढवत टोमॅटो पिकावर क्रॉप कव्हर टाकले. हा क्रॉप कव्हर बाजारात सहज मिळत असुन त्याचे दर कमी आहेत. या क्रॉपव्हरमुळे पिकाचे उन्हापासुन संरक्षण तर होतेच पण पिकावर कोणतीही रोगराई येत नाही व बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाला पाणीही कमी लागते. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत नाही.