नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – सरकारने कांदा निर्यात शुल्कावर चाळीस टक्के वाढ केली आहे. तसेच पावसाने दडी मारल्यामुळे पूर्ण पिके वाया गेले असून शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यामुळे सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यासह पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तुळजापूर शहरातील मुख्य बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
त्यामुळे सोलापूर, धाराशिव, लातूर व गावातून होणारी वाहतूक ठप्प झाल्याने हे चारही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, सरकारने येत्या ८ दिवसांत याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिला. या आंदोलनास तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी पाठिंबा दिला.