जळगाव/प्रतिनिधी – वाढत्या उन्हाळ्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांना, शेतातील पिकांनाच बसत नाहीये. तर, मुक्या जीवांना देखील कडक उन्हाळ्याचा त्रास होत आहे. मेंढीपालन हे अनेक मेंढपाळांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. पण या रखरखत्या उन्हामुळे मेंढया दगावल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी परिसरात मेंढपाळांनी चराईसाठी आणलेल्या तब्बल 30-35 मेंढ्या उष्माघाताने दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने मेंढपाळांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशातच मेंढपाळांनी आज चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेतली. आमदार मंगेश यांनी तात्काळ प्रशासनाला पंचनाम्यासाठी निर्देश दिले आहे. यावर मेंढपाळांनी त्यांचे आभार सुद्धा मागितले.