नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल २०० महिला व पुरूषांना विषबाधा झाली असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली. या ग्रामस्थांना पोलीस व इतर ग्रामस्थांनी बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खाजगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले असून, रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकांमध्ये सध्या प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला होता. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली. ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला होताच, त्यांनी व ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरूषांना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले व तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली आहे.