नेशन न्यूज मराठी टीम.
गोंदिया / प्रतिनिधी – महामार्गावरील अर्धवट सुरु ठेवलेले काम शिवाय रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे दुचाकीवर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना जीव मुठीत ठेवत प्रवास करावा लागतोय. तसेच शेतमालाची ने आण करताना देखील शेतकरी व्यापाऱ्याला त्रास सहन करावा लागतो. अन अशा रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वेळ खर्ची होवून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना देखील रस्त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याला लागुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर सलग 18 तास वाहनांची कोंडी झालेली होती. विशेषता साकोली ते शिरपुर/बांध सुमारे 50 किलोमिटरच्या अंतरापर्यंत खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे अशी स्थीती असल्याने वाहनचालकांना सलग 18 तास जाम मध्ये अडकून रहावे लागले होते . महामार्गावर अग्रवाल ग्लोबन कंपनी तर्फे सुरु असलेल्या उड्डानपुलाच्या बांधकामामुळे सतत वाहनचालकानां याचा त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी रात्री पासुन बंद पडलेले राष्ट्रीय मार्गावर पुन्हा सुरु झाल्याने वाहनचालकांनी मोकळा श्वास घेतला असला तरी या राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा कधीही वाहतुक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.