DESK MARATHI NEWS.
मुंबई/प्रतिनिधी – आगामी ईद सणानिमित्त मुंबईसह राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली.
मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री अस्लम शेख, अबू आझमी, अमीन पटेल, रईस शेख, श्रीमती सना मलिक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबालसिंग चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था नेहमीच उत्तम राखली जाते. त्याचप्रमाणे आगामी ईदसाठी देखील शासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असून या काळात कायदा व सुव्यवस्था राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या वतीने यावेळी ईद निमित्त करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.