पालघर/प्रतिनिधी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पालघर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३३ वि वरिष्ठ गटाची तायक्वांदो स्पर्धा आणि १३ वि पुमसे स्पर्धा २ ते ४ डिसेंबर दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी 28 जिल्ह्यातील 550 खेळाडू आपला कस अजमावणार आहेत. कोरोना या जागतिक महामारी नंतर संपन्न होणारी ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे खेळाडूंमध्ये जोश निर्माण झाला आहे तसेच नामदेव शिरगावकर यांनी तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर होत असलेल्या ही पहिली स्पर्धा आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले, विरारचे आमदार क्षितीज ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षांनंतर स्पर्धा होत असल्यामुळे आयोजनात काही उणिवा राहू नयेत म्हणून भास्कर करकेरा, अनिल झोडगे, मिलिंद पठारे, विरसिंह देवारिया, प्रवीण बोरसे, अविनाश बारगजे, गफार पठाण, वेंकटेश कररा, सुभाष पाटील, दुळीचंद मेश्राम व आयोजक राजा मकवाणा आणि इतर पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत असे तायक्वांदो असॉशिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांनी सांगितले.
तायक्वांदो या ऑलिंपिक खेळात मध्ये प्रगती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोरोना काळानंतर होणारी पहिलीच स्पर्धा असल्यामुळे शासनाची सर्व कोरोना नियमावली पाळून आम्ही या पहिल्या स्पर्धेचे आयोजन केले असून आम्ही स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या संपन्न करू असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी दिली.
तर राज्यातील तायक्वांदो हायटेक करण्यासाठी आम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धाही ऑलिम्पिक च्या नियमानुसार व पद्धतीनेच आम्ही तायक्वांदो स्पर्धा घेणार असून यामध्ये आम्ही कोणतीही कसूर मागे सोडणार नसल्याचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव संदीप ओंबासे यांनी सांगितले.