वर्धा/ प्रतिनिधी – वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झाल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होईल. जेनेटीक लाईफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी आहे.
वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिवीर उत्पादनाला सुरूवात झाली. येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीत उत्पादनास परवानगी मिळवून दिली. आज ६ मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत उत्पादनाची पाहणी करीत आढावा घेतला.यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.
श्री.गडकरी यांनी यावेळी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, औषध उत्पादन डोळ्यांनी बघायला मिळाले असल्याचे सांगितले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पहिल्यांदा करून महाराष्ट्रातदेखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सगळ काही आम्हालाच मिळाले पाहिजे असा आग्रह नाही मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
इंजेक्शनकरीता अस्वस्थता होती. काही लोकांनी काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला. ती वेळ राहणार नाही. गोरगरीबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणालेत. वर्ध्यात उत्पादन सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण, जिद्दीने काम केले. देशातील, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी मदत केली. अन्न व औषधी प्रशासन विभागाने मदत केली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मांडलेकर यांनी परवानगी देण्यात मदत केली. अनेकांचे याकरीता सहकार्य मिळाले. हेट्रो या हैद्राबादच्या मल्टीनॅशनल कंपनीने जेनेटिक लाईफ सायन्सेसला सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. इंजेक्शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला असेही श्री.गडकरी म्हणाले.