सोलापूर/प्रतिनिधी – मोहोळ येथील सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांच्या अंगावर टेम्पो घालून खून केल्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात मोहोळ पोलिसांना यश आले असून आरोपींना पोलिसांनी कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.आरोपी गेल्या 15 दिवसापासून पोलिसांना चकवा देत होते.आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती.आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याना पकडणे पोलिसांना कठीण चालले होते.अखेर मोहोळ पोलिसांनी गुप्त खबऱ्या व तांत्रिक विभागाची मदत घेत सोमवारी पाच आरोपींना कर्नाटक राज्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे.त्यांना मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.
याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या महिनुसार, 14 जुलै रोजी मोहोळ येथील सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांच्या अंगावर टेम्पो घालून खून केल्या प्रकरणी मोहोळ पोलिसात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष सुरवसे,रोहित ऊर्फ आण्णा फडतरे,पिंटू सुरवसे,आकाश बरकडे,व रमेश ऊर्फ गोटू सरवदे यांच्यासह चालक भैय्या अस्वले यांच्यावर खुनाचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.यातील टेम्पो चालक भैया असवले याला पोलिसांनी 15 जुलै रोजी अटक केली होती तर उर्वरित पाच आरोपी फरार होते.आरोपीना पकडण्यासाठी पोलीस सतत त्यांच्या मागावर होते.आरोपी कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील हिरोळी गावच्या भाग्यवंती मंदिरात असल्याची गुप्त माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली.
पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी ताबडतोब पावले उचलून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर खारगे,पोलीस हवालदार शरद ढावरे, पांडुरंग जगताप,गणेश दळवी,हरिदास थोरात यांना सोबत घेऊन कर्नाटक राज्यातील हिरोळी गाव गाठले व आरोपीना गराडा टाकून साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले.