नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण /प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते रिजन्सी अनंतम येथील बायोगॅस प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.बायोगॅस वर शाळेत असताना आपण सर्वांनी अभ्यास केला होता. पण ही गोष्ट फार कमी वेळा अमलात आणली जाते. सरकारच्या वतीने किंवा महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीचे प्रकल्प बऱ्याच ठिकाणी उभे केले जातात. पण खाजगी गृह संकुलामध्ये फार कमी वेळा बायोगॅस प्रकल्प उभारला जातो. पण डोंबिवली मध्ये पहिल्यांदाच एका खाजगी गृह संकुल रिजन्सी अनंतम मध्ये बायोगॅस प्रकल्प उभारला गेला आहे. ज्यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर पडणारा कचऱ्याचा भार थोड्याफार प्रमाणात कमी होईल. ओल्या कचऱ्याचे विघटन जागेवर करता येणं शक्य असल्यामुळे त्या गॅस मधून मिळणाऱ्या विजेमुळे त्या प्रकल्पाची मशीन तर कार्यरत राहीलच पण त्यासोबतच परिसरातील स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा खर्च देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते. त्यांच्याहस्ते बायोगॅस प्रकल्पाची मशीन ऑन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी महेश अग्रवाल, अनिल भटिजा, उद्धव रूपचंदानी, विकी रूपचंदानी, संतोष डावखर तसेच रिजन्सी अनंतम मधील रहिवाशी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बायोगॅस प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.
पाणी वाचवा या विषयावर एक छोटेसे स्किट देखील रिजन्सी अनंतम मधील रहिवाशांनी सादर केले. सर्वांनी मिळून पाणी वाचवण्यासाठी आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी जाहीर रित्या शप्पथ देखील घेतली. यावेळी बायोगॅस प्रकल्प या विषयावर चित्रकला व पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रिजन्सी अनंतम मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एकूण दहा हजार रुपये ची रोख बक्षिसे आणि ट्रॉफी देण्यात आली. ज्यामध्ये आपली कला रेखाटून वेदांत राणे व रुद्रा पराडकर यांनी प्रथम, अथर्व वाणी व मनुष् कलवारी यांनी द्वितीय, प्रणव येवले व तनिष्का निर्गुण यांनी तृतीय पारितोषिकावर नाव कोरले.