कल्याण/ प्रतिनिधी – मुलांच्या वार्षिक परीक्षा संपताच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाळी क्रीडा शिबिरांचा हंगाम सुरु झालेला असतो. प्रतिवर्षी परीक्षा संपल्यानंतर खेळाडूंच्या कौशल्य वाढीसाठी आणि शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढीसाठी पालक कोणत्या ना कोणत्या शिबिरांमध्ये आपल्या पाल्याला टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु गेल्या वर्षी आणि यावर्षी कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाचे शिबिर तसेच एडवेंचर ऍक्टिव्हिटीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शिबीर आयोजक व प्रशिक्षक यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असून त्याचा फटका त्यांच्या वार्षिक आर्थिक चक्रावर नक्कीच होणार आहे.
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आयोजित होणारे उन्हाळी शिबिरे कोरोना मुळे बंद पडली आहेत. तर काही क्रीडा प्रकाराच्या ऑनलाईन होणाऱ्या शिबिरा कडे खेळाडू आणि पालकांनी या वर्षी पाठ फिरवली असून ऑनलाईन शिबिरांना ही थंडा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उन्हाळी क्रीडा शिबिर आयोजित करणारे क्लब, संस्था व प्रशिक्षक यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
प्रतिवर्षी ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक संस्थाच्या वतीने क्रीडा तसेच एडवेंचर ऍक्टिव्हिटीज विविध शिबिराचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत होते. त्यामध्ये प्रामुख्याने एडवेंचर ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांना मनाली काश्मीर हिमाचल प्रदेश तसेच अन्य राज्यातील थंड हवेच्या ठिकाणी नेऊन विविध प्रकारच्या अडवेंचर ऍक्टिव्हिटीज शिबीर संस्था घेत होत्या. तर काही संस्था लोकल लेवलला जलतरण, फुटबॉल, क्रिकेट, स्केटिंग, कबड्डी, खो-खो, चेस, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती व अथलेटिक्स अशा खेळांचे ३० ते ४० दिवस उन्हाळी शिबिर आयोजित करून खेळाडूंना या खेळातील प्राथमिक स्वरूपाचं स्पोर्टस नॉलेज देण्याचा प्रयत्न प्रशिक्षक व संस्थाचालक करत होते. परंतु कोरोना या जागतिक महामारी मुळे क्रीडा क्षेत्रावर ही संक्रात आली असून सर्व प्रकारच्या स्पर्धा शिबिर आणि आऊटडोअर टूर याला खेळाडू आणि प्रशिक्षक यांना मुकावे लागत असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.
तर गेल्या वर्षी आणि या वर्षी क्रिकेटचा कोणतेही प्रशिक्षण झालं नाही त्यामुळे खेळाडू बरोबरच आमच्या संस्थेला ही खूप मोठा आर्थिक फटका बसला असून, संपूर्ण ग्राउंड मेंटेनेस करणे तसेच ग्राउंडसमन यांना वेतन द्यावे लागत असल्याचे क्रिकेट प्रशिक्षक संतोष पाठक यांनी सांगितले.