प्रतिनिधी
मुंबई – प्रजासत्ताकाच्या निमित्ताने देशभक्तांना निव्वळ आदरांजली वाहून चालणार नाही, तर त्यांच्या त्यागाचे स्मरण करावयास हवे.याच त्याग आणि संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि प्रजासत्ताक जन्माला आले.केंद्रात सरकारे काय, येतील जातील!पण अखेर सामांन्याचे व्यापक हित महत्त्वाचे ठरते,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी येथे कामगारांपुढे बोलताना केले.
प्रतीवर्षाप्रमाणे संघटनेच्या वतीने परेलच्या मजदूर मंझील मधील प्रांगणात ध्वजरोहन समारंभ पार पडला. रा.मि.म.संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे प्रतिनीधी कार्यकर्ते,आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजचे विद्यार्थी या समारंभात सहभागी झाले होत.त्या वेळी ध्वजरोहण सचिन अहिर यांच्या हस्ते पारपडले.
कोरोना महामारीने देशात आणि पर्यायाने आपल्या राज्यात जणू मृत्यूचं तांडव उभं केलं होते,याच्या कटू आठवणी जागवून सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात म्हणाले, देशवासियांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी शेतकरी शेतात घाम गाळून शेती पिकवितो.पण त्यालाच आज न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.सरकारने जाचक कायदे मागे घेण्याबाबत आडमुठे धोरण स्वीकारले आहे तर दुसऱ्या बाजुने कामगार हितकारक कायदे मोडीत कढून कामगार वर्गाला विकलांग केले आहे.तेव्हा शेतकरी-कामगार वर्गाला लवकरच न्याय मिळाला पाहिजे,कारण देशाच्या आर्थिक प्रगतीचे ते मुख्य आधार आहेत.
मुंबईतील एनटीसी गिरण्या चालू करण्यावरील यशस्वी लढ्याचा उल्लेख करून सचिन अहिर म्हणाले,आज लॉकडाऊन मधून असंख्य कारखाने बंद पडून बेकारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.पण सघटनेने अनेक कारखान्यांमध्ये चांगल्या पगार वाढीचे करार घडवून आणले,हे कामगारांच्या एकजुटीचे जिवंत उदाहरण आहे.
संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं.दं.आंबेकर यांनी साथीच्या रोगात गिरणगावात घरोघरी जावून होमिओपॅथिक औषधाद्वारे रुग्ण सेवा केली.तोच आदर्श समोर ठेऊन संघटनेने आता भविष्यात कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्याचा विचार केला आहे.कोरोना महामारी अजूनतरी संपुष्ठात आलेली नाही.
राजकारणाच्या बदलाचा उपयोग कामगारांच्या भल्यासाठी करण्यावर भर देवून सचिन अहिर पुढे म्हणाले.,महाराष्ट्रात तीन प्रमुख पक्षाचे सरकार जन्माला आले,ही
गोष्ट कामगार वर्गाच्या उज्वल हिताला पोषक ठरणारी आहे, असेही सचिन अहिर आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ध्वज संचालन संघाच्या सेवा दलाचे प्रमुख आकेश पांडे यांनी केले.या प्रसंगी संघटनेचे निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, लक्ष्मणतुपे, शिवाजी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



