नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. निर्यात बंदीनंतर कांदा मातीमोल झाला. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदील झालेला. शेतकाऱ्यांसह, विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी अनेक आंदोलने झाली, आरोप प्रत्यारोप झाले. पण अखेर आता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे.
40% निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करत येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही शेतकरी सरकारच्या या निर्णयामुळे नाराज आहेत.
पाणी टंचाईमुळे कांद्याचे उत्पादन जास्त होत नाहीये. त्यामुळे जेव्हा कांदा होता तेव्हा निर्यात बंदी हटवायला हवी होती. आता शेती ओसाड पडली आहे. त्यामुळे आता निर्यात बंदी उठवल्याचा काही फायदा होणार नाही. जर सरकारने हा निर्णय थोडा लवकर घेतला असता तर शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले असते. अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सरकारला शेतकऱ्यांकडून सहानुभूती हवी असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.