नेशन न्यूज मराठी टीम.
भिवंडी/संघर्ष गांगुर्डे – भुमिपुत्रांचा आवाज असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून लवकर मंजूर होण्यासाठी दि. बा. पाटील नामकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची आज भेट घेतली. तसेच केंद्र सरकारकडून नामकरणाला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी विनंती केली. त्याचबरोबर दिबांच्या नावासाठी सर्वप्रथम २०१६ मध्ये लोकसभेचे लक्ष वेधल्याबद्दल आभार मानले.
नवी मुंबईतील नियोजित विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लोकसभेमध्ये २०१६ मध्ये केली होती. तसेच दिबांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या सुरुवातीच्या काळात नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर नवी मुंबईसह रायगड व ठाणे जिल्ह्यात चळवळ उभी राहिली होती. या आंदोलनातही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भाग घेतला होता.
राज्यातील शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात, जनभावनेचा आदर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबांचे नाव देण्यास मंजुरी दिली होती. या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी विनंती दि. बा. पाटील नामकरण समितीचे पदाधिकारी माजी खासदार जगन्नाथ पाटील, रामशेठ ठाकूर, माजी आमदार सुभाष भोईर,दशरथ पाटील, जगदीश गायकवाड, संतोष केणे, दशरथ भगत, राजेश गायकर यांच्यासह समितीतील पदाधिकाऱ्यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ व भाजपाचा दिबांच्या नावाला पाठिंबा आहे. त्यामुळे संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होऊन विमानतळाला दिबांचे नाव मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.



