मुंबई -: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. या व्हायरस रोखण्यासाठी या पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा,स्विमिंग पुल आदी पुढील आदेश येई पर्येंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत दिली. याविषयीचा अध्यादेश काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय खाजगी कंपन्यांन मधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरून काम करण्याची मुभा कर्मचाऱ्याना द्यावी असे आदेशही जारी करण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील परिस्थिती बघता या दोन शहरातील शाळाही बंद राहतील. १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ठरल्या प्रमाणे सुरु राहणार आहे. शाळा आणि विद्यापीठ स्तरावरील परिक्षांबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे आणि बस अत्यावश्यक सेवा असल्याने त्या सेवा बंद करु शकत नाही.नागरिकांनी शक्यतो गर्दीची ठिकाणी टाळावीत,मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावेत, क्रिडा स्पर्धा, राजकिय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमे आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे असे त्यांनी यावेळी सागितले.याशिवाय स्थानिक प्रशासनाने अशा गोष्टींना परवानगी दिली असेल ती लगेच रद्द करण्यात येईल असे सांगत पुढील १५ दिवस आपल्याला काळजी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.