नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही चांगले दिवस आलेले नाही. कारण शेती परवडत नसल्यामुळे अनेकांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन तसेच दुग्ध व्यवसायात आपले नशीब आजमावले. पण दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यातही त्यांना अपयश आले. दुधाचे उत्पादन घेणारे लाखों शेतकरी महाराष्ट्रात आहेत. मोठमोठ्या दुग्ध कंपन्या दुप्पट किमतीत दूध विकून भरपूर नफा कमावतात आणि श्रीमंत होतात. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आज अनेक शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटनं कठीण झालं आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आज भर चौकात दुधाचा अभिषेक करून सरकारचा जाहीर निषेध केला आहे. वारंवार आंदोलने केल्यानंतर सरकारने फक्त आश्वासने दिली पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. दुधाला 25 रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. एकीकडे गाई-म्हशींसारख्या जनावरांना खाण्याचा साधा खर्चही निघत नाही. असे मत शेतकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. शासनाने दुधाला किमान 40 रुपये भाव द्यायला हवा. तसेच ‘सरकारचे धोरण आणि शेतकऱ्याचे मरण’ अशा घोषणा करत शेतकऱ्यांनी शासनाचा जोरदार निषेध केला. तसेच जर पुढील दहा दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संभाजीनगर मध्ये दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.