बदलापूर/प्रतिनिधी – लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होत असताना, बदलापूर पश्चिमेला गांधी टेकडी परिसरात राहणाऱ्या पारु सावंत या ६० वर्षीय महिलेने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. एकीकडे सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीकडे पाठ फिरवण्याऱ्या मतदारांची संख्या वाढलेली असताना, अगदी निसर्गाने अवकृपा केलेल्या व दोन्ही हात गमावलेल्या पारु सावंत यांनी स्वतः चा मतदानाचा हक्क बजावला.
दोन्ही हात नसल्याने, मतदान केल्या नंतर त्यांच्या पायांच्या अंगठ्यावर शाईची निशाणी लावण्यात आली. यावेळी त्यांनी इतर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत, एक वेगळा आदर्श घालून दिला. त्याच बरोबर येणाऱ्या सरकारने तरुण वर्गासाठी नोकरी व गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अश्या अपेक्षा व्यक्त केल्या. बदलापूर पश्चिमेकडील गांधी नगर व परिसरातील अनेक महिलांनी आवाहनाला प्रतिसाद देत, मतदानाला प्राधान्य दिले. सकाळी लवकरच आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पूर्ण करण्याचे ठरवले व आम्ही ते कर्तव्य बजावले अश्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.