डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेतील केमिकल कंपनीत आग लागण्याची मोठी बातमी समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी फेझ दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहे. कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी इमारतीच्या काचा देखील फुटल्या आहेत. यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारतींना स्फोटाचा वेळी मोठे हादरे बसले.
एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या परिसरातील नागरीक भयभयीत झाले आहे. काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी मधील अती धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलवाव्यात ही जनतेची मागणी आता तरी पूर्ण करा अशी मागणी स्थानीय राहिवाशांनी केली आहे. स्फोटात किती नागरीक जखमी झाले याची माहिती अद्याप मिळाली नसून आजूबाजूच्या नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याआधी 16 मे 2016 रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर दोनशे नागरीक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते. आज तीच पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होवून झाली. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. तो अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही आणि त्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. आता पुन्हा तीच चौकशी समिती नेमणार हे नक्की. प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमींना नुकसान भरपाई मिळाली नाही.