कल्याण प्रतिनिधी– पश्चिमेच्या बैलबाजार परिसरात असणाऱ्या नामांकित मॉलमध्ये काम करणारे 6 कर्मचारी कोरोना पोजिटीव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकाच वेळी इतके कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा मॉल बंद करण्यात आला असून याठिकाणी जाऊन आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.
बैलबाजार परिसरात असणारा हा मॉल इथल्या गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी कोणत्याही वेळेला गर्दीच दिसत असते. इथली गर्दी पाहता केडीएमसीने याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चाचणीत 6 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे गेल्या मंगळवारी 16 तारखेला हा मॉल पुढील 5 दिवसांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या असणाऱ्या रूग्णसंख्येनूसार टेस्टिंग वाढवल्याने आपल्याकडील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याची प्रतिक्रिया साथरोग नियंत्रण अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. बुधवारी कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 593 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येच्या आकड्यांबाबत नागरिकांकडून उलट सुलट प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येनूसार आरोग्य विभागातर्फे उपाययोजना राबविल्या जात असून 5 पेक्षा जास्त रुग्ण सापडणाऱ्या इमारती आणि हॉटस्पॉट ठिकाणांमध्ये ‘इंटेनसिव्ह टेस्टिंग’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरून त्या परिसरातील (asymptomatic) कोणतीही लक्षणे नसणारे रुग्ण शोधून त्यांचे विलगीकरण (isolation) करता येईल. लवकर रुग्ण आढळून आल्याने त्याच्यावर लवकर उपचार करण्यासह त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्गही रोखण्यास मदत होत असल्याचे पानपाटील यांनी सांगितले.
तर केंद्र सरकारने दररोज 2 हजार 500 टेस्टिंग करण्याचे निर्देश दिलेले असताना आपल्याकडे काल 3 हजार 500 टेस्टिंग करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आपल्याकडे पॉझिटिव्हीटी रेट वाढला असला तरी सुदैवाने डेथ रेट कमी आहे. सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये जो काही ट्रेंड दिसतोय त्यानूसार भाजी मार्केट आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे लोकांनी टाळणे अत्यावश्यक आहे. अशा ठिकाणी एखादा लक्षणे नसलेला (asymptamatic positive) व्यक्ती असू शकतात. ज्यामुळे मोठ्या संख्येने इतरांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे ज्यांनी कोवीड टेस्ट केली आहे त्यांनी अहवाल येईपर्यंत लोकांनी अजिबात बाहेर फिरू नये, घरीच थांबावे. या गाईडलाईन लोकांनी फॉलो करण्याचे आवाहन प्रतिभा पानपाटील यांनी यावेळी केले.