WWW.nationnewsmarathi.com
कल्याण/प्रतिनिधी – वाहतुक कोंडी टाळुन पादचा-यांना प्राधान्याने जागा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी आज केले. कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या गरजेच्या अनुषंगाने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे, वाहतुक कोंडी कमी करणे, पार्किंग धोरण, सिग्नल यंत्रणा या बाबी संदर्भात मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. या बैठकीस शहर वाहतुक ठाणेचे पोलीस उपायुक्त डॉ. विजय राठोड, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक, वाहतुक व्यवस्था, आरटीओचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व महापालिकेचा संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता.
स्टेशन परिसरात रिक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते, त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, वाहतुक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक बनवुन पार्किंग (P1, P2) रिक्षा स्टॅन्ड याबाबत धोरण ठरविण्यात यावे. जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. शहरातील सिग्नल यंत्रणा सुरळीतरित्या कार्यान्वित ठेवण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा यांनी आपापसात समन्वय ठेवावा आणि जास्त प्रमाणात वाहतुक कोंडी होणा-या ठिकाणी व वेळी सिग्नलसाठी वेळेचे स्लॉट ठरवुन द्यावेत, अशाही सूचना आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिल्या.
गर्दीच्या ठिकाणी मुख्यत: मार्केट परिसरात पे ॲन्ड पार्क योजना चालु करावी, अशा सूचना ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. संदर्भात पोलीस विभागाने यासाठी संबंधित परिसर निश्चित करुन द्यावा, जेणेकरुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी दिले.